गुरुवार, २२ जुलै, २०१०

मराठ्यांचा इतिहास ?

डिसेंबर १२९३ ला, ५०० मैलांवरुन आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीने ८००० स्वारांनिशी देवगिरीवर हल्ला केला, त्यावेळी शंकरदेव यादव (राजपुत्र आणि सेनापती) खूप सारं सैन्य घेऊन दूर कुठेतरी गेला होता. देवगिरीवर असलेल्या ४००० स्वारांसोबत राजा रामदेवरायाने प्रतिकार केला पण तो तोकडा पडला. त्याने शेवटी तह केला.

पण हि बातमी कळताच शंकरदेव यादव परत आला तो मोठी फौज घेऊन देवगिरीच्या रक्षणासाठी आला. पण एका अफवा पसरली. दिल्लीहून फार मोठी येणार आहे. या अफवेने घाबरून राजा रामदेवराय शंकरदेवाच्या मदतीला आलाच नाही. शंकरदेवाने खिलजीच्या सैन्याला चांगलेच झोडपून काढले, पण त्याच वेळी देवगिरी किल्ल्याच्या मागे असलेली १००० स्वारांची फौज खिलजीच्या मदतीला आली. त्यांच्या घोडांच्या टापांनी इतकी धूळ उडवली की फारसं काही दिसत नव्हतं. त्यामुळे सैन्याला वाटलं की दिल्लीहून येणारी अफाट फौज म्हणजे हिच ती. आणि यादव सेना घाबरून पळायला लागली. ६ फेब्रु. १२९४...

खंडणी दिली गेली... किती ? ६०० मण सोनं, ७०० मण मोती, २ मण हिरे-माणकं आणि १००० मण चांदी, ..... आणि रामदेवरायाची मुलगी.... (संदर्भ :- बाबासाहेब पुरंदरे.... )

मराठी सेना हरली ती कशामुळे ? केवळ एका अफवेमुळे, की रामदेवरायाच्या अनाठायी भीतीने? की आक्रमणाला सज्जच नसलेल्या रामदेवरायाच्या अदूरदर्शीपणामुळे ? की मराठी माणसं त्यावेळच्या संतांनी दाखवलेल्या भक्ती-मार्गाला लागल्यामुळे ?

तेव्हापासून जो दिल्लीचा दरारा बसला, तो छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे वगळता तो आजतागायत कायम आहे, हे आपलं दुर्दैव का आपल्या कर्माची फळं.....

ह्या आक्रमणापूर्वी असलेल्या संपन्न महाराष्ट्राचा इतिहास अगदीच थोडक्यात शिकवला जातो.... आता तर "कोथळा"ही पुस्तकातून काढून टाकलाय. मराठी माणूस पेंढा भरून ठेवलेला वाघ झालाय का ?

का म्हणून आम्हाला आमचा वैभवशाली इतिहास शिकवला जात नाही ? फक्त देशमुख-देशपांडे आणि त्यांच्या वतनदारी.... आणि थोडक्यात छत्रपतींचा इतिहास... बस्स ? आम्हाला मुळातूनच अस्मितारहित करण्याचे कारस्थान खिलजीपासून आजपर्यंत चालूच आहे का ?

स्वातंत्र्यपूर्व काळातही इतिहास गांधीजी आणि नेहरू यांच्याच भोवती फिरतो. त्यावेळी महाराष्ट्रात कोणी नेतेच नव्हते? इथे स्वातंत्र्यचळवळ झालीच नाही ? मग तिचा इतिहास कुठे गेला ? का आम्ही लाचारच राहावं म्हणून तोही झाकला जातो ?

हत्तीच्या पिल्लाला बांधण्यासाठी जाडजूड दोरखंड बांधले जातात, मात्र मोठ्या हत्तींना साधी साखळीही पुरते, कारण त्याची प्रतिकार करण्याची इच्छाच मरून गेली असते.... असाच मराठी माणूस झालाय का ?

ज्या छत्रपतींनी शाहिस्तेखानाची (ज्याची फौज १ लाख होती) बोटे छाटली, त्यांच्याविषयी भलतंसलतं लिहिणाऱ्या लेखकाच्या पुस्तकावर भारतात बंदी घलू शकत नाही.... त्याची बोटे धजलिच कशी असं काही लिहायला.... का आम्हीच सुर्याजीचे वंशज निर्माण करून स्वतःलाच मातीत घालतोय ...... कशासाठी ... कशासाठी ?

शुक्रवार, १६ जुलै, २०१०

सुपारी

"काय रे, खूप उडायला लागलास तू ? "

"कोण बोलतंय ? "

"तुझा बाप.... xxxx .. ओळखलं नाही का ? "

"अं... नाही. "
"मी बंड्यादादा बोलतोय.... चल हप्ता पोचव पटकन नाहीतर ... "

"नाहीतर .......... "

"नाहीतर तुला पोचवीन... हि हि हि ... "

*************************

"का रे .... तू मला काय येडा समजलास काय ? "

"......... "

"तू पोलिसांकडे कंप्लेंट केली ते मला समजत नाय काय ? अबे भुक्कड.. जगायचं असेल तर ५०,००० पोचव ..... नाहीतर तुझा तेरावा घालीन मी.... समजला काय ? बंड्यादादा म्हणतात मला"

************************************

"हॅलो"

"बंड्या को देना"

"बोल रहा हूं ... तू कौन है बे ? "

"तुला पैसा पायजे का माझं नाव ? "

"काम बोल"

"टपकाना है"

"किसको ?"

"डॉ. घोटकर"

"क्यू ? "

"तेरेको क्या लेना देना ... तू पैसे ले और ... "

"ऐ, वो अपून को ५०,००० का हप्ता देगा... "

"मी तुला १० लाख देतो ... बोल ? "

"पण ... कोंबडी खतम करून ... "

"पाहिजे का ठेवू ? "

"ऍडव्हान्स ? "

"ठीक आहे पण ५०,००० चं देणार.. बाकी काम झाल्यावर... "

"पण ... "

"पाहिजे का ........?"

"बरं... "

"अजून एक ... "

"आता काय ?"

"त्याच्या अंगावरच सोनं काढायचं आणि चाकूने त्याला खतम करायचं"

"पण .... "

"जसं सांगितलं तसच करायचं .... काय समजलास ... घोडा नाही वापरायचा.... "

"ठीक आहे, आपल्याला काय ...... पण ऍडव्हान्स"

"ठीक आहे. आज रात्री ११ वाजता ..... "

**********************************

"हॅलो, वाळकेश्वर पोलिस चौकी"

"हॅलो, मी डॉक्टर घोटकर बोलतोय ... "

"आता काय आहे ... अरे रात्रीसुद्धा त्रास देता हो ... तुमची कंप्लेंट घेतली होती ना लिहून ..."

"अहो माझ्या हातून खून झालाय .... "

"काय ? कुणाचा ? "

"ते माहिती नाही... पण कोणीतरी चोर असावा ... "

**********************************

"स्वतःचा बचाव करण्यासाठीच डॉ. घोटकरांनी गोळी चालवली, हे सिद्ध झाले आहे. पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवून लगेच अँब्युलंस पाठवली असती तर कदाचित मयत बंड्या वाचला असता. त्यामुळे डॉ. घोटकरांना निर्दोष सोडण्यात येत आहे.......... "

***********************************

"चला सुटलो एकदाचा.... महिना ५०,००० पेक्षा एकदाचे ५०,००० परवडले .... "

बुधवार, १४ जुलै, २०१०

ताण ...

"विनू अरे उन्हाळ्यात पुन्हा लावू ना केबल"

"आई प्लीज, अग मी फक्त डिस्कवरीच बघतो"

"हो, पण आता तुझा अभ्यास वाढला की नाही ? "

"पण म्हणून डिस्कवरी नाही बघायचं, टेबल-टेनिस नाही खेळायचं, मासिकं नाही वाचायची"

"असा रे काय करतोस ? मागच्या वर्षी तो ऋषी फक्त २ मार्कांनी मागे होता तुझ्या. "

"असू दे"

"असू दे काय ? पहिला नंबर गमवायचा आहे का ? "

".... "

"चल हे दूध घे अन जा ट्युशनला"

"शाळा, ट्युशन, क्लासेस, .... मला कंटाळा आला आहे... "

"काय रे कशाचा कंटाळा आला आहे? "

"बाबा, तुम्ही तरी सांगा ना आईला, प्लीज"

"तुझ्या डिस्कवरीचं ना ? "

"हो"

"मीच बंद केलंय कनेक्शन"

"पण मग मला काही करमणूकच नाही"

"शाळा सुरू असताना कशाला हवी करमणूक? मी ८ वीत असताना .... "

"बस झालं तुमचं पुराण"

"पुराण ? म्हणजे माझी मेहनत तुला फालतू वाटते ? अरे कधी पहिला नंबर सोडला नव्हता मी, म्हणून आज इतका यशस्वी आहे मी. आज हा पैसा दिसतोय ना ती माझी मेहनत आहे, तुझ्यासारखा टीव्ही पाहत अन टेनिस खेळत बसत नव्हतो मी"

"पैसा काय चाटायचा आहे ? "

"विन्या ....... खूप बोललास.... तुझी जीभ जरा जास्तच चालायला लागलीय. "

"हो ? मग हासडून टाका एकदाची"

"विन्या......."

"अहो, प्लीज मारू नका त्याला"

"तूच त्याला शेफारून ठेवलंय"

"तू जा रे ट्युशनला"

"जातो... पण मला डिस्कवरी नाही मिळालं तर .. "

"आता बघतोच मी कसा बघतो तू टीव्ही ते... "

******************************************************

"अहो... "

"उं... "

"अहो उठा ना ... चार वाजले.. "

"ए तू मूर्ख आहेस का ? चार वाजता मला काय उठवतेस ? मला नाही तुझ्या लाडक्या लेकाला अभ्यास करायचा आहे, त्याला उठव. मला झोपू दे"

"अहो म्हणूनच उठवतेय"

"काय कटकट आहे, काय झालं?"

"अहो तो दार उघडत नाही आहे. "

"हा नं जरा जास्तच करायला लागला आहे. मी बघतो असा कसा उठत नाही ते... "

"ए विन्या, ऊठ... दार उघड... "

"विनू दार उघड रे ... "

"विन्या ........ आता उठतोस की दार तोडू मी ? "

"अहो... ही किल्ली... "

"हं .......... आतून चिटकणी लावलीय लेकानं, थांब जरा, मी धक्का दिला की लगेच उघडेल बघ... "

"विन्या ........ ए ऊठ ... तोंडावर पाणी मार त्याच्या... "

"अहो, हा उठत का नाहीय ? विनू... ए बाळा, अरे ऊठ ना...."

"अहो काय झालं"

"नाडी चालू आहे, पण ... "

"अहो जरा खालच्या मजल्यावरच्या डॉ. शिंदेंना बोलावता का ? "

***************************************************************

"डॉ. शिंदे, मी शरद जाधव, ३०२ मधून बोलतोय.... हो ... माझा मुलगा .... अहो तो उठतच नाहीय हो ... हा प्लीज ... नाही अँब्युलन्स कशाला, माझ्याकडे गाडी आहे... तुम्ही येता का प्लीज ... "

****************************************************************

"डॉक्टर ... "

"काळजी करू नका ... पण झोपेच्या गोळ्या त्याच्या हाती कश्या लागल्या ? "

"माहिती नाही हो ... "

"मुलांवर जबरदस्ती कशाला करताय मि. जाधव ? ताणायचं किती याला काही मर्यादा ? "

"हो पण... आजकालच्या काँपिटिशन ... "

"पण मुलगाच नाही राहिला तर कसली काँपिटिशन अन कसलं काय ? "

"आय ऍम सॉरी डॉक्टर... "

"सॉरी मला नाही, त्याला म्हणा .... आणि मला वाटते, तुमचा मुलगा अभ्यासात कमी पडत नाही तर मग कशाला त्याचा आनंद हिरावून घेताय ? बाकी तुम्ही समजदार आहात .."

"हो ... आम्ही त्याला भेटू शकतो.. "

"हो पण .... त्याला झोपू द्या... उठवू नका "

*******************************************************************

"अरे विनय, ये ये .... काय म्हणतोस ? कसं वाटतंय आता ? "

"एकदम छान... काका तुम्ही होतात म्हणून वाचलो मी ... "

"अरे काहीतरीच काय ? बाबा काय म्हणतात ? डीस्कवरी सुरू झालं का ?"

" हो आणि टेबल टेनिससुद्धा ... आता ते रागवत नाही... पण तुम्हाला केलेलं प्रॉमिस मी पाळणार हा ... पहिला नंबर नाही सोडणार ... "

"शाब्बास !!! "

"आणि काका, एक स्पेशल थँक्यू ... "

"आता हे कशाबद्दल ? "

"त्या जायफळासाठी ... "

शनिवार, १० जुलै, २०१०

भलत्या वेळी

प्रत्येक माणसाला (विशेषतः पुरुषाला) हव्या त्या गोष्टी मिळतात, फक्त त्याची वेळ चुकलेली असते. त्याचे कारण म्हणजे स्त्रीहट्ट असावा. (स्त्री = आई किंवा बायको).

लहानपणी सर्वात प्रिय गोष्टींपैकी दोन म्हणजे खेळ आणि झोप. पण आई नामक प्राण्यामुळे झोपेचे खोबरे आणि खेळाचे पानिपत व्हायला वेळ लागत नाही. जेव्हा बाळ १-२ वर्षाचं असतं तेव्हा त्याला खेळावंस वाटतं, पण आई त्याला "झोप रे आता" म्हणत जबरदस्तीने झोपवते. खायचे नसेल तर जबरदस्तीने खाऊ घालते.

हेच बाळ जेव्हा शाळेत जाऊ लागते, तेव्हा त्याच्या सकाळच्या झोपेत व्यत्यय आणत, "अरे ऊठ रे आता... शाळेची वेळ झाली ...." अश्या प्रेमळ सूचनांपासून "आता उठतोस की येऊ मी " अश्या धमक्या देत उठवते. खेळायला जायच्यावेळी "आधी खवून घे" चा धोशा चालू असतो. आणि परत आल्यावर प्रचंड भूक लागली असताना " संध्याकाळच्यावेळी जेवू नये, थांब जरा" म्हणत ताटकळत ठेवते. जेवण होताच झोप येऊ लागते, पण "होमवर्क कोण करणार... " म्हणत अभ्यास घेते.

उन्हाळ्यात आंबे खायची वेगळीच मजा असते, असं फक्त पुस्तकातच वाचायचं असते. कारण "बस कर रे आता, एक खाल्ला नं, आता उद्या" असं म्हणत तेही सुख मिळू देत नाही.

जेव्हा हेच बाळासाहेब कॉलेजात जातात, परगावी राहतात आणि सुट्टीत अभ्यास घेऊनच घरी येतात, तेव्हा नको असताना, "किती वाळलास म्हणत वर्षभराचं खाण्याचं सामान १५ दिवसात संपवण्याचा सपाटा लावते. उन्हाळ्याच्या सुटीत डॉक्टरकडे जायची वेळ येईपर्यंत आंब्याचा रस खाऊ घालते. रात्री अभ्यास करावा की हि आलीच. "राहू दे रे अभ्यास, तो काही पळून नाही चालला" म्हणत झोपायचा आग्रह करते. आणि सकाळीसुद्धा उठवत नाही.

लग्नानंतरतरी आपल्या मनासारखं वागता येईल तर शपथ. कारण त्यावेळी मातोश्रीच्या रूपातच बायको नामक प्राणी गळ्यात बांधला असतो. मधुचंद्राला गेल्यावर सकाळी भूक लागली म्हणून ब्रेकफास्टसाठी उठावं तर, " ए, काय हे, झोप न थोड्यावेळ" म्हणत ती ओढून घेते, पण तिकडून परत आल्यावर घरी जरा झोपावं म्हटलं तर, " अहो आवरा, ७:४० ची सुटेल" पासून "आता उठताय की पाणी आणू " अश्या धमक्या सुरू होतात. सकाळी ब्रेकफास्ट नको म्हणत असताना कोंबला जातो. दोन पोळ्यांची भूक असली तरी ४-५ पोळ्या, वरण, भात, भाजी (झक्कास तर्रीवाली), चटण्या, आणि हे कमी झालं म्हणून संत्री/ मोसंबी वगैरे फोडी करून डब्यात दाबून भरलेली असतात. असं वाटते की सालं हॉस्टेलला असतानाच लग्न केलं असतं तर पोटाचा प्रश्न सुटला असता. पण हे सगळं वर्ष दोन वर्ष. तेव्हड्यात वजन आणि पोट चांगलंच वाढलेलं असतं.

मुलं झाली की, "डबा भरून घ्या आणि चिंटूचाही डबा भरा. आधी त्याला सोडा मगच ७:४० पकडा." स्वतः उठा आणि चिंट्यालाही उठवा. म्हणजे दुसरंही पाप करा, पोराला झोपू न देण्याचं. रवीवारीसुद्धा जॉगिंग टळत नाही आणि पोट (वाढलेलं) कमी होत नाही. वाढत्या वजनाला जास्त जेवण हवं असतं. एव्हाना चमचमीत खाण्याची सवयही झाली असती, पण तिच्या माहेरचा कोणी डॉक्टर सांगतो अन चमचमीत पदार्थांच्या जागी कारली, दुधी भोपळा, कच्ची भाजी, गाजर वगैरे कंदमूळं खाण्याची पाळी येते.

स्वतःचं वजन सांभाळत नसताना, "जरा चिंट्यासोबत खेळा हो" असं म्हणत वजन कमी करण्यासाठी बॅटमिंटन वगैरे प्रयोग केल्या जातात. लहाणपणी बॅटमिंटनची फुलं परवडत नाही म्हणून वर्षानुवर्षे त्या बॅटस खिळ्यावर आणि मग माळ्यावर पडलेल्या असतात, त्या निघतात त्या अश्या.

पन्नाशीनंतर बऱ्याच गरजा आणि काळज्या कमी होतात. वयोमानानुसार झोपही कमी होते. आता जरा योगासनं वगैरे करून तब्येत ठाकठीक करावी म्हटलं की , " आयुष्यात जरा कधी शांतपणे झोपू द्याल का ? " असं म्हणत सौ. त्याला मोडता घालणारच. पण पुढे ५-१० वर्षात म्हणणार, "सकाळी उठत जा आता, योगासनं करा, फिरायला जा.... आता रिटायर्ड झाल्यापासून नुस्ते घरात बसून असता ...." सुनबाईने काही चांगले पदार्थ केले की, " त्यांना सहन होत नाही, त्यांना नको देऊस" म्हणत उपासमार केली जाते.

ऐनकेन प्रकारेण आमची वाट लावण्याचा वसा त्यांनी सासुबाईंकडून घेतला असतो, तो काही टाकत नाही ....

थोडक्यात सगळ्या गोष्टी मिळतात पण नको तेव्हा आणि जेव्हा हव्या तेव्हा ह्या दोघींपैकी कोणीतरी एक मिळू देत नाही... काय करणार आम्ही पडलो पुरुष बिच्चारे !